२०१२०९१६

ईकोफ़्लो

नाशिकमधील सातपूरचे श्री.नरेन भिंगे



आणि त्यांनी निर्माण केलेला अद्वितीय पंप



एक हलका, ने-आण-सुलभ, मनुष्यचालित पाणी-क्षेपक (पंप); नाशिकमधील सातपूरच्या  श्री. नरेन भिंगे ह्यांनी तयार केला आहे.

ईकोफ्लो नावाचा हा क्षेपक केवळ १२ किलो वजनाचा असून, तासाभरात, २५ फूट (७ मीटर) खोल विहीरीतून पाणी खेचून ४५ फूट (१५ मीटर) उंचीवरील इमारतीत, २,००० ते ५,००० लिटर पाणी साठवू शकतो.

शून्य संचालन खर्च असलेला हा क्षेपक केवळ रु.२,५००/- मध्ये उपलब्ध असल्याची बातमी २००८ मध्ये प्रथम प्रस्तुत झाली होती [१]. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांनी ज्या वैतागवाडी गावास भेट देऊन त्यास आशाकिरण हे नाव दिले होते त्या गावाचा उत्कर्ष साधण्याचे काम ह्याच पंपाने केले होते.

सृजनशीलतेचा हा आविष्कार, सह्याद्री वाहिनीवरील “अतुल्य शोध” कार्यक्रमांतर्गत, “अभियंत्रज्ञदिनाचे” औचित्य साधून १५ सप्टेंबर २०१२ रोजी संध्याकाळी ६ वाजताचे सुमारास प्रसारित करण्यात आला.

व्यक्तीशः माझ्यातर्फे आणि खरे तर आपणा सर्व भारतीयांचे वतीने, ह्या “अतुल्य शोधा”करता नरेन भिंगे ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! सह्याद्री वाहिनीच्या ह्या पुढाकारासही माझ्या अनेकानेक  शुभेच्छा!

सुमारे ६० किलो वजनाच्या व्यक्तीने त्यावर उभे राहून चालवायचा हा क्षेपक असल्याने, सर्वोच्च कार्यक्षमता साधली गेलेली आहे. अशा अद्वितीय सृजनाचे आपणा सगळ्यांसच अपरूप वाटायला हवे. ह्या शोधाने गरीब शेतकर्‍यांना मोलाचे वरदान दिलेले आहे. अशाच आणखीही अपूर्व शोधांकरता श्री.भिंगे ह्यांना हार्दिक शुभेच्छा!

संदर्भः [१] प्रथम वार्ता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: