http://www.maayboli.com/node/30461
या दुव्यावर प्राजक्ता म्हात्रे ऊर्फ ’जागू’ ह्यांचा खोपा हा लेख वाचला. त्यातल्या प्रातिनिधिक प्रकाशचित्रांनी सुंदर घराच्या नीटस घरबांधणीचे सुखद दर्शन घडवले. बहिणाबाई म्हणतातः
अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला । देखा पिलासाठी तिनं, झोका झाडाला टांगला ॥ धृ ॥
त्या खोप्याचे खरेखुरे बहारदार वर्णन म्हणजे "...झोका....". वावरातल्या विहीरीवर बाभळीच्या लांबसडक डहाळीच्या दूरवर झुलत्या टोकावर बांधलेला खोपा, झोका तर झुलवतोच, शिवाय कुठल्याही शत्रूला तिथवर पोहोचणेच असंभव करत असतो!
पिलं निजली खोप्यात, जसा झुलता बंगला । तिचा पिलामधी जीव, जीव झाडाले टांगला ॥ १ ॥
आईच्या जीवाची आपल्या लेकरासाठी होणारी घालमेल, माया, ममता, काळजी ह्या ओळी ओळींतून जणू ओसंडून वाहते. ज्या सुगरण पक्षावरून ही कविता बहीणाबाईंना सुचली ते दिसायला जसे मोहक असतात तशीच त्यांची कलाकुसरही सुबक असते. "झुलता बंगला" ह्याहून खोप्याचे यथार्थ वर्णन ते काय असेल!
खोपा इनला इनला, जसा गिलक्याचा कोसा । पाखरांची कारागिरी, जरा देख रे मानसा ॥ २ ॥
गिलके, दोडके, घोसावळे जेव्हा वेलावरच वाळून, सुकून जाते; तेव्हा जाळीदार सुक्या रेषांचे शिंकेच असावे तसे दिसत असते. त्यालाच गिलक्याचा कोसा म्हटले आहे. निसर्गतःच घडलेला कोसा वाटावा, इतक्या बहारीने खोपा विणलेला असतो. त्यातील गवताची रेषा अन् रेषा घराच्या उपयुक्ततेचे प्रयोजन सार्थ करत असते. माणसालाही नमूना सादर करणारी पाखराची कामगिरी, बहिणाबाईच दाखवून देऊ जाणे!
तिची उलूशीच चोच, तेच दात, तेच ओठ । तुले देले रे देवानं, दोन हात दहा बोटं ॥ ३ ॥
रचना - संत बहिणाबाई चौधरी, संगीत - वसंत पवार, स्वर - सुमन कल्याणपूर, चित्रपट - मानिनी (१९६१)
उलूशाच चोचीने केलेल्या कारागिरीची कमाल, जागूताईंनी अतिशय सुबकपणे चौकटबद्ध केली आहे. ईश्वरी कृपेने दोन हात. दहा बोटे लाभलेल्या मनुष्याने खरे तर याहून कितीतरी सरस कामगिरी करावयास हवी! ही बहिणाबाईंची अपेक्षा सार्थ करण्यास प्रोत्साहित करणारी ही प्रकाशचित्रे जशी मला आवडली तशीच तुम्हालाही नक्कीच आवडतील. ती इथे पुन्हा प्रदर्शित करू दिल्याखातर जागूताईंचे मनःपूर्वक आभार!

हे सुगरण पक्षी एखाद्या झाडावर जणू आपले गावच वसवतात. रहदारी जिथे कमी असेल तिथे किंवा आपले गाव जिथून इतरांना दिसू शकणार नाही अशा ठिकाणी असलेले झाड ते बहूतेकदा निवडतात. एकाच झाडावर ह्यांची १५-२० कुटुंबे वसतात. यांची घरटी सहसा बाभळी वर किंवा नारळाच्या झाडावर असतात. तीही अगदी टोकाला. असे केल्याने सापापासून अंड्या पिल्लांचे संरक्षण करता येते. समुहाने राहण्याच्या फायदा हा की एकाला जरी धोका वाटला तर कलकलाट करुन बाकिच्यांना सावध करता येते. हे पक्षी हवे असलेले धागे कसे गोळा करतात ते पण बघण्यासारखे असते. गवताची पात अगदी मूळापासून तोडतात आणि तशीच चोचीत धरुन उडतात.
घरटे बांधायची कला नराला अवगत असली तरी पहिली एक दोन वर्षे त्याचे प्रयत्न फुकट जातात, मादीला त्याचे घरटे पसंत पडले नाही तर त्याचा घरोबा होत नाही. पण जुने जाणते नर मात्र एकाच हंगामात २/३ घरोबे करतात. खास आपल्या बाळांच्या जन्मासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी हे सुगरण पक्षी अतिशय मेहनतीने ही घरटी बनवतात. आतमधल्या खोलगट भागात कापूस वगैरे ठेवून मऊ गादी केलेली असते. त्यात पिल्ले मजेत राहतात. या घरट्यात पावसाचे पाणी जात नाही तसेच याची फांदीवरची पकड एवढी मजबूत असते की कितीही वारा आला तरी ती सुटत नाही. नर हे घरटे तयार करतात व मादी ते निरखून ते पाहून त्यात रहायचे की नाही हे ठरवते. एकदा का घरटं निवडून झालं की मग नर ते पुरे करतो. मादी त्यात अंडी घालते. पिल्लांना जन्म देऊन वाढवण्याची पूर्ण जबाबदारी मादीची असते. बाळे स्वावलंबी झाली की नंतर घरटी सोडून देतात.

नरेंद्र गोळे narendra.v.gole@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा